शिरदाळेत १०० देशी वृक्षांचे वृक्षारोपण; वृक्षवल्ली संस्थेला परदेशातून आर्थिक पाठबळ

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज,आंबेगाव (प्रतिनिधी ) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे मित्र परिवार’ या संस्थेच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे येथे वृक्षारोपण व सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत ७० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली, तर ग्रामस्थांना ३० औषधी वनस्पतींचे रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच संस्थेच्या पर्यावरणपूरक व सामाजिक कार्याची दखल घेत विविध देणगीदारांनी एकूण ६४ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वड, पिंपळ, जांभूळ, करंज, कांचन, नारळ आणि उंबर या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा या उद्देशाने अडुळसा, इन्सुलिन आणि कढीपत्ता या औषधी वनस्पतींची ३० रोपे ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांना भेट देण्यात आली.यानंतर गावातील मंदिरात आयोजित सन्मान सोहळ्यात शिरदाळे गावाचे कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबा प्रकटस्थान (सागदरा) येथील जीर्णोद्धार व सुशोभीकरणासाठी योगदान देणाऱ्या ग्रामस्थांचा औषधी रोपे देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला.शिरदाळे गावचे सुपुत्र व सध्या लंडन येथे वास्तव्यास असलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयातील पीएच.डी. धारक डॉ. संकेत सुभाष काचोळे यांनी संस्थेच्या कार्यासाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. उद्योजक व कंत्राटदार मनोज बारकू तांबे यांनी १० हजार रुपयांचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला. तसेच कै. रामदास तुळशीराम तांबे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी ४ हजार ५०० रुपयांची देणगी दिली. त्यामुळे संस्थेला एकूण ६४ हजार ५०० रुपयांचा निधी प्राप्त झाला.या निधीच्या माध्यमातून भविष्यात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण तसेच गावहिताचे विविध सामाजिक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

कार्यक्रमास शिवऋण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अक्षय बोराडे, हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजीशेठ चासकर, यादवशेठ चासकर, दैनिक सामनाचे उपसंपादक विठ्ठलराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अंकुश भूमकर, धामणीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सागर जाधव, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.वृक्षवल्ली आम्हा सोयरे मित्र परिवारातील सुमारे ४० सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संदीप सुरेश तांबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक सुशांत राजू तांबे यांनी केले.”झाडे लावूया, झाडे जगवूया, निसर्ग वाचवूया, समाज घडवूया” हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *