
रोखठोक मराठी न्यूज,
प्रतिनिधी | आळंदी”ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला आज आळंदीत उत्साहात प्रारंभ झाला. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीने मंदिरातून आजोळ घराकडे प्रस्थान केले असून, उद्या (९ जुलै) सकाळी ६ वाजता पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
मुसळधार पाऊस, इंद्रायणी नदीला आलेला महापूर आणि काही ठिकाणी निर्माण झालेली पूरस्थिती यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. तरीही वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्साह किंचितही कमी झाला नाही. विविध मार्गांनी हजारो भाविक आळंदीत दाखल झाले आणि “माऊली… माऊली…” तसेच “ज्ञानोबा-तुकाराम”च्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

परंपरेनुसार धार्मिक विधी संपन्नदुपारी सुमारे ४.१५ वाजता माऊलींच्या अश्वांचे आगमन झाले. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने मानकरी मंडळींना श्रीफळ व प्रसाद देण्यात आला. पारंपरिक पद्धतीने श्रींची आरती संपन्न झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता माऊलींचे अश्व मंदिराबाहेर आले.सायंकाळी ६.१५ वाजता टाळ-मृदंगाच्या गजरात, विणेकऱ्यांच्या भजनात आणि “माऊली… माऊली…”च्या जयघोषात पालखी मंदिरातून बाहेर पडून आजोळ घराकडे रवाना झाली. पालखी बाहेर येताच भाविकांनी पुष्पवृष्टी करून माऊलींचे स्वागत केले.आकर्षक पुष्पसजावटीने मंदिर खुललेयंदा श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराची अत्यंत आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. सुमारे २४ तासांहून अधिक काळ ही सजावट सुरू होती. मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्गावर पावसामुळे साचलेले पाणी सातत्याने साफ करण्यात येत होते, जेणेकरून भाविकांना कोणताही त्रास किंवा दुखापत होऊ नये.

महापुरानंतरही भक्तीचा उत्साह कायम इंद्रायणी नदीच्या महापुरामुळे परिसरात मोठे नुकसान झाले असले तरी वारकऱ्यांच्या श्रद्धेला त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. “चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू” ही भावना मनात ठेवून भाविक मोठ्या संख्येने आळंदीत दाखल झाले.मानकऱ्यांचा सन्मानपालखी प्रस्थानापूर्वी श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकार आणि श्रीमंत महादजी राजे शितोळे सरकार यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर मानाच्या दिंड्यांना परंपरेनुसार श्रीफळ प्रसादाचे वितरण श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले.यंदा पालखी मार्गात बदलपूरानंतर काही पुलांच्या सुरक्षिततेचा अंतिम स्ट्रक्चरल अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने प्रशासनाने यंदा पालखी मार्गात बदल केला आहे.उद्या सकाळी आजोळ घरातून निघाल्यानंतर केवळ ५० मानकरी पारंपरिक मार्गाने पुढे जातील. तर उर्वरित पालखी सोहळा आळंदी पोलीस स्टेशन – विठ्ठल रुक्मिणी चौक – मरकळ चौक – पीसीएस कंपनी चौक – चऱ्होली खुर्द – चऱ्होली फाटा या पर्यायी मार्गाने मुख्य पालखी मार्गाला मिळून पंढरपूरकडे प्रस्थान करेल.संस्थान कमिटीचे आवाहनश्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने वारकरी, विणेकरी आणि फडकरी यांना प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, चऱ्होली फाट्यापासून पालखी सोहळ्यात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.