रोखठोक मराठी न्यूज
पुणे, (प्रतिनिधी) : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अंतर्गत जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश १३ जून २०२६ रोजी रात्री १२.०५ वाजल्यापासून २६ जून २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.
या आदेशानुसार दाहक अथवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड, शस्त्रे, काठ्या, तलवारी, बंदुका यांसारखी इजा पोहोचवू शकणारी साधने जवळ बाळगणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, प्रतिकात्मक पुतळ्यांचे प्रदर्शन अथवा दहन करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी चिथावणीखोर भाषणे करणे यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, सभा आयोजित करणे किंवा मिरवणुका काढणे यांनाही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, शासकीय कर्तव्य बजावणारे कर्मचारी तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार शस्त्र बाळगण्यास परवानगी असलेल्या व्यक्तींना या आदेशातून वगळण्यात आले आहे.सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी दिली आहे.